महाविकास आघाडीतील वंचितच्या समावेशाबद्दल १५ दिवसात निर्णय घ्या, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

अकोला, ६ जुलै २०२३ : शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याचे दिसत आहे. वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा सूचक इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. लवकर निर्णय झाला नाही तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे असल्याचे मोठे विधान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. आंबेडकरांचे भारत राष्ट्रीय समितीसोबत संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे विधान सूचक मानले जात आहे.

या वेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यासंदर्भात काय बोलणे झाले आहे का? हे स्पष्ट करावे आता निवडणुका जवळ आल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबतच्या सध्याच्या बोलणीवर ‘थँक्यू’ म्हणत बोलणे टाळले. राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर अजित पवारांची स्तुती केली. अजित पवार जे ओठात, तेच पोटात असणारा नेता असल्याची स्तुतीसुमने आंबेडकरांनी अजित पवारांवर उधळली आहे.

राष्ट्रवादीतील बंडखोरी विषयी बोलताना आंबेडकर म्हणाले, शरद पवारांवर होत असलेल्या पेरले तेच उगवले या आरोपांमध्ये तथ्य नाही. राजकारणात परिस्थितीनुरूप राजकीय तोडफोडीचे निर्णय घ्यावे लागतात. पवारांनी आतापर्यंत राजकारणासाठी जे केले ते आता त्यांच्यासंदर्भात घडले आहे. राजकारणातले ‘रणछोडदास’ सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे समोर आले आहेत. चौकशांच्या छायेखालचे लोक अजित पवारांसोबत गेले, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अजित पवारांनी कालच्या भाषणात शरद पवारांसंदर्भात केलेल्या गौप्यस्फोटांबद्दल आपण सातत्याने बोललो. अजित पवारांनी केलेले चारही गौप्यस्फोट त्यावर शिक्कामोर्तब करणारे आहे. वंचित आणि उद्धव ठाकरेंना सोबत लढायचे असल्यास लवकर निर्णय घ्यावा लागेल. यासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे,असेही आंबेडकर म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा