प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही जीआर नाही!

राज्यातील अशासकीय महाविद्यालयांमधील ५ हजार १२ प्राध्यापक आणि २ हजार ९०० शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी, नेट-सेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीने पुण्यात उच्च शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर लाक्षणिक आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जुलै रोजी भरतीची घोषणा करूनही दोन महिने उलटले, तरी अद्याप भरतीचा शासन निर्णय (जीआर) निघालेला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला.

कंत्राटी प्राध्यापकांचे शोषण थांबवावे आणि १०० टक्के पदे भरावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ‘समान कामाला समान वेतन’ या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत, अनेक प्राध्यापकांनी आत्महत्या केल्याचे दु:खद वास्तव त्यांनी मांडले. जर भरतीची प्रक्रिया पुढे सरकत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. प्रमोद तांबे यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले