राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, आता राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी समूह’ हा एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. समान आवडीनिवडी आणि कला असलेल्या मुलांना एकत्र आणून त्यांना एकमेकांकडून शिकण्याची आणि आपली कौशल्ये विकसित करण्याची संधी देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभवातून शिकतील, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवेल, नेतृत्वगुण विकसित करेल आणि त्यांच्यातील सर्जनशीलता व कल्पकतेला प्रोत्साहन देईल, अशी अपेक्षा शिक्षण विभागाला आहे. शिक्षकांच्या मते, हा उपक्रम पारंपरिक वर्गखोलीच्या बाहेर जाऊन मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यास मदत करेल. यामुळे मुलांमध्ये केवळ वैयक्तिक कौशल्येच नाही, तर संघभावना आणि समस्या सोडवण्याची क्षमता देखील वाढेल.
प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कला, क्रीडा, विज्ञान किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात रस असलेले विद्यार्थी एकत्र येऊन नवनवीन कल्पनांची निर्मिती करतील. यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक आधुनिक आणि विद्यार्थी-केंद्रित होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































