लॉकडाऊन दरम्यान डाळी आणि तेलबियाणांची खरेदी प्रक्रिया सुरळीत

नवी दिल्ली, दि. ११ मे २०२०: लॉकडाऊन कालावधीत शेतकरी आणि शेतीच्या कामांना सुविधा पुरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारचा, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग अनेक उपाययोजना राबवीत आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अद्ययावत स्थिती खालीलप्रमाणे:

१) लॉकडाऊन कालावधीत नाफेडद्वारे पिकांच्या खरेदीची स्थिती:

आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधून २.७४ लाख मेट्रिक टन चण्याची खरेदी करण्यात आली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात आणि हरियाणा या ५ राज्यांमधून ३.४० लाख मेट्रिक टन मोहरीची खरेदी करण्यात आली आहे.

तेलंगणा मधून १,७०० मेट्रिक टन सूर्यफुलाची खरेदी करण्यात आली आहे. तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आणि ओदिशा या ८ राज्यांमधून १.७१ लाख मेट्रिक टन तूर खरेदी केली आहे.

२) उन्हाळी पिकांचे पेरणी क्षेत्र खालीलप्रमाणे आहे:

तांदूळ: मागील वर्षीच्या उन्हाळी तांदळाच्या २५.२९ लाख हेक्टर पेरणी क्षेत्राशी तुलना करता यावर्षी या क्षेत्रात वाढ होऊन ते अंदाजे ३४.८७ लाख हेक्टर झाले आहे.

डाळी: गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे १०.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची पेरणी केली असून गेल्यावर्षी याच हंगामात ५.९२ लाख हेक्टरवर डाळींची पेरणी करण्यात आली होती.

तृणधान्ये: मागील वर्षीच्या तृणधान्यांच्या ६.२० लाख हेक्टर पेरणी क्षेत्राशी तुलना करता यावर्षी या क्षेत्रात वाढ होऊन ते अंदाजे ९.५७ लाख हेक्टर झाले आहे.

तेलबिया: यावर्षी सुमारे ९.१७ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी करण्यात आली असून गेल्यावर्षी याच हंगामात ७.०९ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी केली होती.

३) रब्बी पणन हंगाम (आरएमएस) २०२०-२१ मध्ये एफसीआयमध्ये २४१.३६ मेट्रिक टन गहू दाखल झाला, त्यापैकी २३३.५१ मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली.

४) रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये ११ राज्यात रब्बी डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी एकूण ३२०६ निर्धारित खरेदी केंद्र उपलब्ध आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा