मुंबई, ४ ऑगस्ट २०२३ : राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पुन्हा फूट पडणार असल्याची चर्चा आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर हे राजू शेट्टी यांच्यावर नाराज असून बंड करण्याच्या तयारी आहेत. याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की, राजू शेट्टी यांनी संघटनेत काम करणाऱ्या लोकांचा घात केला आहे. राजू शेट्टी हा मांजरीची जात आहे. बोका कसा आपल्या पिल्लांना मारतो तसा हा बोका आपल्या कार्यकर्त्यांना मारतो, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने परिश्रम घेतले आहेत. विदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी चा झेंडा हातात घेऊन हिमालयामध्ये झेंडा रोवावा असे काम रविकांत तुपकर यांनी केले. गेल्या वीस वर्षापासून स्वाभिमानीचा झेंडा हातात घेऊन पायाला भिंगरी बांधून संघटना वाढीसाठी रविकांत तुपकर काम करत आहे. परंतु बहुजन समाजातील एखादा चेहरा मोठा व्हायला लागला, बरोबरीला यायला लागला, शेतकरी त्याला खांद्यावर घ्यायला लागले की त्याला पायाखाली कसा तुडवायचा, याचा विचार राजू शेट्टी करतात. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समोरच्याची शिकार करण्याचा पायंडा राजू शेट्टींचा जुना आहे. मांजरीन स्वतःची पिल्ले खाती तशी राजू शेट्टी ही मांजरीचीच जात आहे. कार्यकर्ता मोठा झाला नाही पाहिजे कार्यकर्त्याला काही मिळाले नाही पाहिजे ही राजू शेट्टींची कायमची भावना आहे.असे सदाभाऊ खोत म्हणाले.
रविकांत तुपकर हे विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम गेल्या वीस वर्षापासून करत आहेत. परंतु त्यांना काम करत असताना अनेक अडचणी येत होत्या, त्या संदर्भात त्यांनी माझ्यासोबत सुद्धा चर्चा केली होती. ते सुद्धा या प्रकरणांमुळे अस्वस्थ होते. आता ते बुलढाणा जिल्ह्यामधून खासदारकीची तयारी करत आहेत, परंतु माझ्यासोबत सुद्धा असाच प्रकार राजू शेट्टी यांनी केलेला आणि बहुजन नेत्यांना संघटनेमध्ये दाबण्याचे काम केले,असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर