मराठी शाळेत शिकलेल्या सागर मिसाळने युपीएससी मध्ये वाजवीला डंका

सोलापूर, दि. ७ ऑगस्ट २०२०: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा नागरी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल दि. ४ ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून यामध्ये माळशिरस तालुक्यातील वाघोली गावच्या शेतकरी कुटुंबातील युवक सागर भारत मिसाळ याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून वयाच्या २४ व्या वर्षी यश संपादन केले. संपूर्ण देशातून २०४ व्या रँकने सागरने अटकेपार झेंडा फडकविला यामुुळे वाघोली ग्रामस्थांतून आनंद व्यक्त्त आहे.

सागरचे प्राथमिक शिक्षण वाघोली येथील जि.प.शाळेत, माध्यमिक शिक्षण विजयसिंह मोहिते महाविद्यालय वाघोली तर उच्च माध्यमिक शिक्षण स. मा .वि .अकलूज येथे झाले. त्याने इ. चौथी व इ. सातवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळविला होता. बी.एससी ऍग्री शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर यूपीएससीसाठी विशेष शिष्यवृत्तीमधून त्याची निवड झाली होती. सागरचे वडील एक सर्वसामान्य शेतकरी तर आई गृहिणी आहे.

यूपीएससीच्या लेखी परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आल्या होत्या. तर फेब्रुवारी – ऑगस्ट २०२० च्या दरम्यान व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली होती. त्याचा अंतिम निकाल आज ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची विविध पदांवरील नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. गुणवत्तेनुसार उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा ग्रुप ए आणि ग्रुप बी या ठिकाणी नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

 कष्ट, जिद्द आणि परिश्रम हेच यशाचे रहस्य                                                                             

अधिकारी होण्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, परिश्रम करावे लागतात. मला माझ्या घरच्यांबरोबर गुरुजनांचीही मोठी साथ लाभली. याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा मला लाभ मिळाला असुन शासन नेहमीच विद्यार्थ्यांसाठी सहकार्याच्या भूमिकेत असते. ग्रामीण भागातील मुलांनी आपल्यामध्ये कधीच उणीव न बाळगता जिद्द, परिश्रम आणि कठोर मेहनत घेतल्यास यश मिळते.” – सागर मिसळ. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा