पुणे २७ जून २०२३: पुण्यातील दिघी येथे रविवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने, संभाजी भिडेंच्या व्याखान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय. १५ ऑगस्ट हा काळा दिवस असल्याचे म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. १५ ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती, असे संभाजी भिडे म्हणाले.
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हावादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते १८९८ ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही,असे भिडे व्याख्यानात म्हणाले.
भिडेंच्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताला राजकीय स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ लाच मिळालेे. आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे की, त्यादिवशी भारताची फाळणी झाली, विभागणी झाली. आपल्याला अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत होईल, तेव्हाच समाधान होणार आहे. पण याचा अर्थ १५ ऑगस्ट १९४७ भारताचा स्वातंत्र्य दिवस नाही, हे त्या अर्थाने कुणी म्हणत असेल तर योग्य नाही, तोच आपला स्वातंत्र्य दिवस आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.