मुंबई : फडणवीस सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजीनामा दिला. आणि राज्यातील सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांनी महाविकास आघाडीची स्थापन करुन आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या आघाडीच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बनतील.
गुरुवारी(दि.२८) रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्कवर त्यांचा शपथविधी होणार आहे. त्यांचा शपथविधी रोखण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीविरोधात ही याचिका हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांनी केली होती. त्यांनी याचिकेत निवडणूकपूर्व युती तोडून नव्या आघाडीचे सरकार बनवणे ही मतदारांची फसवणूक असल्यामुळे शपथ घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखावे अशी मागणी करण्यात आली होती.












































