गोल पोस्ट राष्ट्रीय समुद्र सेतू अभियान: आयएनएस जलाश्व दुसऱ्या टप्प्यासाठी मालदिवला परतली

समुद्र सेतू अभियान: आयएनएस जलाश्व दुसऱ्या टप्प्यासाठी मालदिवला परतली

नवी दिल्ली, दि. १५ मे २०२०: परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे मायदेशी परत आणण्यासाठी सुरु केलेल्या समुद्र सेतू अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस जलाश्व माले, मालदीव येथे परत गेली आहे. हे जहाज आज १५ मे २०२० रोजी पहाटे माले येथे दाखल झाले आणि मालदीव मधील भारतीय दुतावासात नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांना जहाजावर प्रवेश देईल. आपल्या दुसऱ्या प्रवासात, आयएनएस जलाश्व ७०० भारतीय नागरिकांना मायदेशी घेऊन येईल अशी योजना असून हे जहाज १५ मे च्या रात्री कोचीसाठी रवाना होईल.

याआधी १२ मे २०२० रोजी ६९८ भारतीय नागरिकांना यशस्वीरीत्या कोची येथे आणल्यानंतर आयएनएस जलाश्वने निर्वासन अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीला सुरुवात केली ज्यामध्ये संपूर्ण जहाजाचे निर्जंतुकीकरण आणि सॅनिटायझेशन समाविष्ट होते यात परत आलेल्या नागरिकांच्या मागील गटाने वापरलेल्या जहाजाच्या भागाकडे विशेष लक्ष देण्यात आले होते.

जहाजाने माले बाहेर नांगर टाकला असून १५ मे २०२० रोजी भारतीय नागरिकांच्या दुसऱ्या गटाला जहाजामध्ये प्रवेश द्यायला सुरुवात करेल, ज्यामध्ये १०० महिला आणि बालकांसह अंदाजे ७०० भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version