श्रीगोंदा शहरासह तालुक्यात सात दिवसांचा लॉकडाऊन.

श्रीगोंदा, १२ सप्टेंबर २०२०: संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात सात दिवसांचा लॉकडाऊन करण्यासंदर्भात आज तहसील कार्यालयात स्थानिक प्रशासन, व्यापारी असोसिएशन व जाणकारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात सर्वानुमते सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याला दुजोरा देण्यात आला. त्यानुसार दिनांक १३ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते २० सप्टेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत श्रीगोंदा शहरासह तालुक्यात लॉकडाऊन असणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील जाणकार नागरिक, प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार, पोलिस निरीक्षक, आरोग्य विभाग, पंचायत समिती, नगरपालिका इत्यादी प्रशासकीय कार्यालयांचे प्रमुख व श्रीगोंदा नगरपालिका सदस्य व्यापारी असोसिएशन सदस्य व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकारांच्या उपस्थितीत एकत्र बैठक घेत, श्रीगोंदा तालुक्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू (बंद) पुकारला. या जनता कर्फ्यूसाठी श्रीगोंदा तालुका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सहकार्य करण्यात येणार असल्याचे व्यापारी असोसिएशनचे सतिशशेठ पोखरणा यांनी स्थानिक प्रशासनाला बैठकीच्या अनुषंगाने सांगितले.

सर्व नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी यामध्ये उस्फुर्तपणे सहभागी होवून बंद यशस्वी करावा. असे आवाहन माजी मंत्री व आमदार बबनराव पाचपुते यांनी नमूद बैठकीत केले आहे. लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.

या बैठकीसाठी (माजी मंत्री व आमदार) बबनराव पाचपुते, (माजी जि.प.अध्यक्ष) बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, (अप्पर तहसिलदार) चारुशीला पवार, (नायब तहसिलदार) डॉ. योगिता ढोले, (आरोग्य अधिकारी) डॉ. नितीन खामकर, (श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी) देवरे, प्रा. तुकाराम दरेकर, व्यापारी असोसिएशनचे सतीशशेठ पोखरणा, गौरव बोरा, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

रविवार दिनांक १३ पर्यंत सर्व नागरिकांनी फिजिकल डीस्टन्स पाळून सात दिवसांसाठी आवश्यक असणारा किराणा व गरजेच्या वस्तू खरेदी कराव्यात. सोमवारपासून सकाळी ७ ते ८ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पाणी दूध वाटप होईल. मेडिकल, हॉस्पिटल सोडून बाकीची सर्व दुकाने बंद राहतील. सरकारी कार्यालये कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहतील. लॉकडाऊन चालू असताना ट्रिपल सीट आणि विना मास्क फिरणाऱ्यांवर पालिका प्रशासन आणि पोलिसांची करडी नजर असेल. विना मास्क फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी या अनुषंगाने दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा