शरद पवार प्रीती संगमावर, लोकांच्या गराड्यात येऊन थेट भाजपलाच ललकारले

कराड, ३ जुलै २०२३ : महाराष्ट्रात अजितदादांच्या रूपाने पुन्हा राजकीय भूकंप घडल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवशेनेतून केलेले बंड सर्वश्रुत आहे. राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत अनेक दिवसांपूर्वी अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिले होते. त्यावेळी अनेकांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. मागच्या महिनाभरापूर्वी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुध्दा राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

भाजपने गेल्यावर्षी शिवसेना फोडली. त्यानंतर काल राष्ट्रवादीचा एक मोठा गट फोडला आहे. अजितपवारांनी भाजपशी हातमिळवणी करुन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे मोठे नेते फुटून गेल्याने राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काल (२,जुलै)अचानक राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर शरद पवारांनी माझे या गोष्टीला समर्थन नसल्याचे जाहीर केले होते. पक्षातील या पडझडीनंतर, उद्यापासून आपण बाहेर पडत असून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढील कामाला सुरुवात करत असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज पवार कराडमध्ये दाखल होऊन प्रीतीसंगमावर यशवंतरावाच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर शरद पवार काय बोलतात, याकडे राज्यासह देशातल्या नेत्याचे लक्ष लागले होते. प्रीती संगमावरून पवारांनी भाजपवर जोरदार हल्ला केला.

या वेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.भाजपचे सरकार सध्या देशासह महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने मागच्या कित्येक महिन्यांपासून फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. सध्या जी समादविघातक जी काही प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात आज सगळ्यांनी उभे राहण्याची गरज आहे. त्याच पद्धतीचे काम आपण महाराष्ट्रात करीत होतो. पण सध्या एकोप्याने राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे पवार म्हणाले.

राज्यातील सरकार या ना त्या कारणाने काही लोक उलथवून टाकण्याचे काम करत आहेत. हे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये केले आहे. चुकीच्या प्रवृत्ती सध्या डोके वरती काढत आहेत. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्रात आहे. सध्याच्या प्रवृत्ती विरोधात महाराष्ट्रातील शक्ती नक्की उभी राहिल. त्याचबरोबर त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका पवारांनी भाजपवर केली आहे.

आज गुरु पोर्णिमा आहे, त्यामुळे आजच्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावरुन अपप्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची सुरुवात करुया असे पवार म्हणाले.यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, आदी नेते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा