कांदा निर्यात बंदीला शरद पवारांचा विरोध…

मुंबई, १५ सप्टेंबर २०२०: मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी कांद्याचे दर वाढू नयेत याची खबरदारी घेत केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात थांबवली. सरकारच्या या निर्णयाचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोध केलाय. तसेच कांदा निर्यातीबाबत निर्णय घेताना व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या, असं मत व्यक्त केलं.

यासंदर्भात शरद पवार यांनी दिल्लीत पियुष गोयल यांची भेट घेतली. शरद पवार यांनी पियुष गोयल यांना शेतकऱ्यांची स्थिती आणि या निर्णयाचे दुष्परिणाम यावर माहिती दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शरद पवार म्हणाले की, “मोठ्या प्रमाणात शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा.”

याबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी ही टीका केलीय. “आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे. म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला जात आहे” अशी टीका त्यांनी केली. याच बरोबर केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे.

“आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला. फक्त २ ते ४ रुपये किलो भाव मिळत होता. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला. पण तो ही कांदा चाळीत सडला. थोडाफार कांदा शिल्लक राहिला. त्याला आता समाधानकारक दर मिळतो आहे. पण, झालेलं नुकसान बघता, शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही. त्यात निर्यात बंदीमुळे भाव पडले. तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होतील”, अशी भीती संदीप जगताप यांनी व्यक्त केली आहे.

कांदा निर्यातबंदी वर शेतकरी नाराज का?

बाजारपेठेत कांदा जेवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध राहील तेवढी कांद्याची किंमत देखील कमी राहील. याउलट बाजारपेठेत कांद्याचा तुटवडा जेवढा जाणवेल तेवढी त्याची किंमत देखील वाढेल. अर्थातच निर्यात बंद केल्यामुळं देशात मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळं कांद्याच्या किमती देखील घसरणार आहेत. सरकारचा देखील हाच हेतू आहे की कांद्याच्या किमतींमध्ये फार मोठी वाढ होऊ नये.

मुंबई, चेन्नई पोर्टवर तसेच बांग्लादेश बॉर्डरवर व्यापाऱ्यांचा वीस हजार मेट्रिक टन कांदा कंटेनर आणि रेल्वे मालगाडीत पडून आहे. कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानं कांद्यानं भरलेले ४०० कंटेनर मुबंई पोर्टवर उभे आहेत. कुठलीही माहिती न देता मुबई पोर्टवर कांदा निर्यात थांबवण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर कांदा निर्यात पूर्ववत न केल्यास रस्ता रोको, रेल रोको आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा