शरद पवारांनी घेतला राज्यपाल कोशारी यांचा खरपूस समाचार, काय म्हणाले वाचा सविस्तर

पुणे, 3 जुलै 2022: काल शरद पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपाल कोशारी यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. प्रलंबित 12 आमदारांची यादी आणि इतर अनेक गोष्टींवरून त्यांनी राज्यपाल कोशारी यांचा समाचार घेतला.

शरद पवार म्हणाले की, “मी 1967 पासून शपथा पाहिल्या आहेत. 1972 ते 1960 पर्यंत मीसुद्धा शपथा घेतल्या. परंतु कुठल्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही. शपथ चुकीची होत असताना राज्यपालांनी दुर्लक्ष केलं आणि पेढा भरवून फुलांचा गुच्छ देताना आपण पाहिलं. चला आनंद आहे एकंदरीत त्यांनी कार्यपद्धतीत बदल केला.”

“मी अमुक अमुक बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून वगैरे वगैरे ते बोलले. ही शपथ दिली कुणी, तर राज्यपाल यांनी दिली. आमचं सरकार आलं त्यावेळी मी पहिल्या लाइनमध्ये बसलो होतो. आमच्या एका सदस्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करून शपथेला सुरुवात केली तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली आणि माझ्या नावाचा उल्लेखही केला. मात्र कालच्या शपथेवेळी श्रीमान राज्यपाल कोश्यारी यांनी हरकत घेतली नाही याचं आश्चर्य वाटतं.”

“आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे मंत्रिमंडळाचा प्रस्ताव करून पाठवला होता. मुळात मंत्रिमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणं हे बंधनकारक असतं असं असताना जवळपास अडीच वर्ष त्यांनी तो प्रस्ताव तसाच ठेवला व कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे याची चर्चा करायची गरज नाही लोकांना हे सर्व ठाऊक आहे. आता 12 आमदारांबाबत राज्यपाल निर्णय घेणार आहेत असं ऐकलंय.”

“एक गोष्ट स्पष्ट होईल की, एका सरकारने अधिकृतपणे मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन नावे दिली होती. त्यावर अडीच वर्षांमध्ये कोणतीही कार्यवाही केली नाही आणि नवं सरकार आल्यावर त्यांच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली जात असेल तर जी शपथ आम्ही घेतो, माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती कुठल्या एका बाजूची आहे हे न पाहता निरपेक्षपणे निकाल देईन… परंतु आताचे राज्यपाल निरपेक्षपणाची जी व्याख्या देशवासीयांसमोर ठेवत आहे हे आपण निरपेक्षपणे पाहत आहोत.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा