औरंगाबाद, ३ सप्टेंबर २०२२: औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत मोबाईल वरून झालेल्या वादातून महिलेने रागाच्या भरात स्वत:च्या दोन मुलांना दुधातुन विष देत स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे तर महिलेची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेने सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली असून, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही मुलांच्या मृत्यू नंतर अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मुदस्सीका हारूण पठाण (वय ९), आयन हारूण पठाण (वय ७ )असे मृत्यू मुलांचे नाव असून, मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्यांच्या आईचे नाव मोमीनबी हारूण पठाण (वय ३५) असे आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोमीनबी आणि त्यांचे पती हारूण पठाण यांच्यात २९ ऑगस्ट रोजी मोबाईलवरून वाद झाला होता. मोमीनबी यांनी आपल्या माहेरच्या लोकांशी बोलण्यासाठी हारूण पठाण यांना मोबाईल मागितला होता. पण कामात असल्याने हारूण यांनी मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.
पतीसोबत झालेल्या वादा नंतर मोमीनबी यांनी रागाच्या भरात उंदीर मारण्याचे विषारी ओषध दुकानातून मागवले. त्यानंतर ते ओषध दुधात मिसळून दोन्ही मुलांना पाजले आणी स्वत:ही पिले. त्यामुळे रात्री च्या सुमारास मुलांच्या तोंडात फेस येत असल्याने हारुण पठाण यांनी त्यांना सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच मुदस्सीका पठाण आणि आयान पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मोमीनबी यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे.
दोन्ही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या मृत्यूनंतर गावात शोकाकुल परिस्थिती पाहायला मिळत आहे. या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही मुलांवर गावातील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतर अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रकाश जगताप