गोल पोस्ट महाराष्ट्र सोशल मीडियाच्या मदतीने उमेदवारांचा जोरदार प्रचार

सोशल मीडियाच्या मदतीने उमेदवारांचा जोरदार प्रचार

कळंब, ८ जानेवारी २०२१ : ग्रामपंचायत निवडणूक च्या या काळात कळंब तालुक्यात सर्वत्र तापलेले वातावरण आहे. गावागावात ऐका हो ऐका चा प्रचार करत भोंगे फिरत आहेत. मात्र, उमेदवार गावात आणि मतदार शेतात अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे.
ग्रामीण भागातील लोक सकाळी सहा ते सात वाजताच गाव सोडून शेतात जात असल्याने उमेदवार हतबल आहेत. याच कारणामुळे कळंब तालुक्यातील  उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.  व्हाट्सएप आणि  फेसबुकच्या  माध्यमातून मतदारांना आकृष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मतदारांना नेहमीची  आश्वासने दिली जात आहेत.त्याच्यापेक्षा मी किती चांगला आहे, हे पटवून दिले जात आहे.
कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात  ग्रामपंचायत निवडणुकीमुळे  वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत पैकी ६ ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या असून ५३ ग्रामपंचायतसाठी अटीतटीच्या लढती होत आहेत. कळंब तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या  ईटकूर, येरमाळा, आणि मंगरूळ ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटीचा सामना  होत आहे.
ग्रामीण भागातील लोक आधी सोशल मीडिया पासून लांब होती. त्यांना याची जास्त ओळख नव्हती. मात्र, बदलत्या काळानुसार आता ग्रामीण भागातील लोकांना देखील सोशल मीडियाची ताकद समजली आहे. याच ताकदीला लक्षात घेता, कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उभारलेल्या उमेदवारांनी सोशल मीडियावर आपल्या प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड
error: Content is protected !!
Exit mobile version