गोल पोस्ट महाराष्ट्र आंबेडकरी मतदानाचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला लोकसभा निवडणुकीत समर्थन

आंबेडकरी मतदानाचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला लोकसभा निवडणुकीत समर्थन

नागपूर, ५ एप्रिल २०२४ : संविधानाला खुलेआम विरोध, महागाई, खाजगीकरण, आरक्षणाचा विरोध, अल्पसंख्याकांचे खच्चीकरण, देशाचे भवितव्य इत्यादी बाबींचा विचार करून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने संपूर्ण राज्यात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा जाहीर करण्यात आला.

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने राज्यातील १९ मतदारसंघात उमेदवार लढविण्याचे घोषित केले होते. आंबेडकरी मतदानाचे विभाजन नको म्हणून उमेदवारांची नावे मागे घेण्यात आली. या निर्णयाचे स्वागत आंबेडकरी समाजाने तसेच पुरोगामी विचारांचा लोकांनी केले. आरिमोने दिलेल्या समर्थनाने संपूर्ण राज्यातील आंबेडकरी समाजात आनंदाची लाट पसरली आहे. आता आंबेडकरी मताचे विभाजन थांबणार असून काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडणुकीत विजयी होतील, असे बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची नागपूर मुक्कामी भेट घेऊन मताचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने समर्थनाचा प्रस्ताव दिला आहे. परंतु अद्याप त्यांच्याकडून रिपब्लिकन मोर्चाला समाविष्ट करून घेण्यासाठी सूचना आल्या नाहीत. त्यांचे पत्र येताच समर्थनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

यावेळी देवेंद्र बागडे, प्रा. रमेश दुपारे, सुखदेवराव मेश्राम, नामदेवराव निकोसे, के.टी.कांबळे, राजु पांजरे, प्रविण आवळे, हंसराज उरकुळे, रामभाऊ वहाणे, सचिन नगरारे, दादाराव पाटील, प्रकाश कांबळे, मनोहर इंगोले, सुभाष बढेल, वैशाली तभाणे, संगीता चंद्रीकापूरे, सुनिता चांदेकर, जुलेखा बेगम, रुबिना खान, प्रेमलता जेकब, प्रकाश कांबळे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

error: Content is protected !!
Exit mobile version