स्वार्थ आहे तो पर्यंतच, नाहीतर…..?

रामगोपाळ सिंह एक निवृत्त शिक्षक आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत ते एकदम स्वस्थ दिसत होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांना खूप ताप आला व कोरोना संक्रमित रुग्णाची सर्व लक्षणं त्यांच्यात दिसायला लागली._

परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसत होती. त्यांचे अंथरूण घराच्या बाहेर असलेल्या जुन्या खोलीत टाकले गेले जेथे त्यांचा पाळलेला कुत्रा ‘मार्शल’ बांधलेला असे.

रामगोपाळनी काही वर्षांपूर्वी एक लहान, घायाळ पिल्लू रस्त्यातून उचलून आणले होते आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळून त्याचे नाव मार्शल ठेवले होते.

या खोलीत आता रामगोपाळ, त्यांचे अंथरूण आणि त्यांचा आवडता मार्शल आहे. दोन्ही मुलं- सुनांनी दूर रहाणे पसंत केले आणि नातवांनाही जवळ न जाण्याची तंबी दिली होती.

सरकारने प्रसिद्ध केलेल्या नंबर वर फोन करुन सूचना दिली गेली. बातमी संपूर्ण भागात पसरली होती परंतु कुणीही भेटायला आले नाही. साडीचा पदर तोंडावर लपेटून, हातात काठी घेतलेली शेजारची कुणी म्हातारी आई आली आणि रामगोपाळच्या पत्नीला म्हणाली -“अरे कोणी यांच्याजवळ जेवण दुरुन तरी सरकवून द्या, ती दवाखान्यातील लोकं तर यांना उपाशीपोटीच उचलून नेतील.”

आता प्रश्न हा होता की, त्यांना जेवण द्यायला कोण जाणार. सुनांनी जेवणाचे ताट आपल्या सासू कडे दिले. आता राम गोपाळच्या पत्नीचे हात ताट पकडताच थरथरायला लागले, पाय जसे खांबाला बांधल्यासारखे झाले.

हे बघून शेजारची म्हातारी आई म्हणाली, “अरे तुझा तर नवरा आहे, तु पण…….. तोंड बांधून जा आणि दूरुन ताट सरकवून दे, तो स्वतः उचलून खाऊन घेईल.”

रामगोपाळ सर्व चर्चा गुपचूप ऐकत होते, त्यांच्या डोळ्यात अश्रु होते आणि कापऱ्या ओठांनी ते म्हणाले, “कोणी माझ्याजवळ येऊ नका, मला भूक ही नाही.”

तेवढ्यात अॅम्बुलन्स आली आणि रामगोपाळना अॅम्बुलन्समध्ये बसायला सांगितले गेले.

रामगोपाळनी घराच्या दरवाज्यावर येऊन एकदा मागे फिरून आपल्या घराकडे बघीतले. नात-नातू तोंडावर मास्क लावून पहिल्या मजल्यावरच्या खोलीतून आजोबांकडे बघत होते आणि त्या मुलांच्या मागे डोक्यावर पदर घेऊन त्यांच्या दोन्ही सुना दिसत होत्या. खालच्या मजल्यावर दोन्ही मुलं आपल्या आईसोबत दूर उभे होते.

रामगोपाळच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.
त्यांच्या नातीने त्यांच्याकडे बघून हात हलवून Bye केले. एका क्षणासाठी त्यांना वाटले की ‘जीवनानेच त्यांना शेवटचा निरोप दिला.’

रामगोपाळचे डोळे भरून आले. त्यांनी खाली बसून आपल्या घराच्या उंबऱ्यावर डोकं ठेवलं व अॅम्बुलन्स मध्ये जावून बसले.

त्यांच्या पत्नीने लगेच पाण्याने भरलेली बादली त्या उंबरठ्यावर ओतली, जेथे
रामगोपाळने डोके टेकवून अॅम्बुलन्स मध्ये बसले होते.

याला तिरस्कार म्हणा किंवा मजबूरी, पण हे दृष्य पाहून कुत्र्यालाही रडू आले. आणि रामगोपाळना घेऊन जाणाऱ्या अॅम्बुलन्सच्या मागे-मागे जाऊ लागला.

रामगोपाळ दवाखान्यात चौदा दिवस आॅब्ज़र्वेशन मध्ये राहिले. त्यांच्या सर्व टेस्ट नाॅर्मल आल्या. त्यांना पूर्णतः स्वस्थ घोषित करून सुट्टी देण्यात आली.

जेव्हा ते दवाखान्यातून बाहेर निघाले तर त्यांना दवाखान्याच्या दरवाजावर त्यांचा कुत्रा मार्शल बसलेला दिसला. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. एकाच्या डोळ्यांतून गंगा तर दुसऱ्याच्या डोळ्यातून यमुना वहात होती.

त्यांच्या मुलांची लांबलचक गाडी त्यांना घ्यायला येईपर्यंत ते आपल्या कुत्र्याला घेऊन दुसऱ्या दिशेने निघून गेले होते. त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत.

आज त्यांच्या फोटोसह त्यांच्या हरवल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली आहे. लिहिले आहे की ‘माहिती देणाऱ्यास ४० हजार रुपये बक्षीस दिले जाईल.’

४० हजार – हो, वाचून आठवले की एवढी तर त्यांची मासिक पेंशन येत असे, जी ते हसत खेळत आपल्या परिवारावर खर्च करून टाकत असत.

एक वेळ रामगोपाळच्या जागेवर स्वतःला उभे करा, आणि विचार करा की या कथेचे पात्र तुम्ही आहात.

तुमचा सगळा अहंकार आणि सर्व मोहमाया संपुष्टात येईल. म्हणून मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की, काही पुण्य कमवा, गरीब, भुकेल्या, लाचारांची मदत करा. जीवनात काही नाही, कुणी आपले नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंतच सर्व तुमचे आहेत.

जीवन एक प्रवास आहे, मृत्यू त्याचे ठिकाण आहे,
हेच अंतिम सत्य आहे.

घरातच रहा! स्वतःचे रक्षक बना!

चंद्रकांत कानडे. 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा