मराठा समाजाच्या निवड झालेल्या युवकांना शासकीय सेवेत घ्या – हर्षवर्धन पाटील

इंदापूर २४ जानेवारी २०२१ :  मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी  विविध स्पर्धा परीक्षांमधून निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या तसेच निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत, अशा मराठा समाजातील सर्वच युवकांना राज्य सरकारने शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, त्यासाठी शासनाने त्वरित अध्यादेश काढावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
मुंबईत आझाद मैदान येथे हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.२४) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करीत असलेल्या  मराठा युवकांची भेट घेतली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी राज्यभरातून धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा युवकांशी संवाद साधला. यावेळी या युवकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांना सादर केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे होणाऱ्या सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे, त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही लागेल ते सहकार्य करण्यास तयार आहोत. विविध स्पर्धा परीक्षांमधून एसईबीसी मधून निवड झालेल्या मराठा समाजातील युवकांना शासनाने त्वरित निवड पत्रे द्यावीत. शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याची मराठा समाजातील युवकांशी मागणी न्याय आहे. सरकारने मराठा समाजातील युवकावर अन्याय करू नये, आता आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही,असा इशाराही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला. यावेळी धरणे धरून बसलेल्या अनेक युवकांनी मनोगते  व्यक्त केली.
न्युज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा