देशात लोकशाही टिकेल की नाही हे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुका ठरवतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट २०२३ : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत एम करुणानिधी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त चेन्नईत आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात एमके स्टॅलिन बोलत होते. देशात लोकशाही टिकेल की नाही हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका ठरवतील, भाजपविरोधी विरोधकांनी मोठ बांधायला सुरुवात केली आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया (India -Indian National Developmental Inclusive Alliance) असे नाव दिले आहे. यासंदर्भात विरोधकांच्या दोन बैठका देखील झाल्या आहेत.

देशासाठी सर्वात आधी तमिळनाडूतून आवाज उठवायला हवा, असे करुणानिधी नेहमी बोलत होते. आता आम्ही त्याच मार्गाने जात असल्याचे स्टॅलिन म्हणाले.
२०२४ लोकसभा निवडणूक पाच वर्षांतून एकदा येणारी नाही, तर ही निवडणूक भारतात लोकशाही टिकेल की नाही? हे ठरवणारी असल्याचे स्टॅलिन म्हणाले. द्रमुक हा एक प्रादेशिक पक्ष असून, आता करुणानिधींचे स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक राज्यांना त्यांचे योग्य हक्क मिळावे यासाठी डीएमकेची भूमिका असल्याचे स्टॅलिन यावेळी म्हणाले. तसेच एमके स्टॅलिन यांनी यापूर्वी निवडणुकीच्या मुद्यावरुन भाजपवर टीका केली. भाजपने पुन्हा सत्ता काबीज केल्यास लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधान कोणीही वाचवू शकणार नाही, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

देशातील भाजपविरोधी २६ पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आव्हान दिले आहे. त्यासाठी विरोधकांनी आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. २०२४ च्या निवडणुकीची रणणिती ठरवण्यासाठी विरोधकांच्या आत्तापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत एक बैठक पाटणा इथं तर दुसरी बैठक बंगळुरु इथं झाली होती. आता तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. विरोधकांनी भाजपाविरोधात मोट बांधल्यानंतर या आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा