गोल पोस्ट इतर इतिहास तानाजी मालुसरे यांनी यशवंती घोरपड वापरली होती का ?

तानाजी मालुसरे यांनी यशवंती घोरपड वापरली होती का ?

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांंच्यासह असलेले तानाजी मालुसरे हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत सहभागी असलेली व्यक्ती आहेत. सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले. स्वराज्यासाठी जिजाऊंच्या इच्छेखातर  कोंढाणा किल्ला मिळवण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरे यांना दिली होती. जेव्हा तानाजी मालुसरे यांना ही जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेउन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.
कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले होते. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे ठरले “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे.”
कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला काबीज करणे गरजेचे होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मुळात घोरपड हा पाळीव प्राणी नाही आणि त्याच्याकडून पाळीव प्राण्याप्रमाणे काम करून घेणे अर्थात किल्ला चढणे वगैरे तर अशक्य. तानाजी मालुसरे यांनी घोरपडीच्या साह्याने चढवून कोंढाणा किल्ला घेतला याचा उल्लेख शाहीर तुलसीदासाच्या पोवाड्यात आलेला दिसतो (एे.पो. पृ. ८३). परंतु सभासद बखरीत “जैसा वानर चालून जातात त्याप्रमाणे मावळे गड सोडून गेले” असे लिहिले आहे (सभासद बखर पृष्ठ क्रमांक ६७). हि घोरपड कथा का वापरण्यात आली आणि कोणी हा खोटा इतिहास पसरवला हे सांगणे कठीण ह्यामुळे मराठ्यांचे सामर्थ्य दडले गेले. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जायचं त्यात खडकावर चढणे, डोंगर दऱ्या तसेच उभ्या कडावर चढणे यांवर जास्त भर असायचा. मराठ्यांत इतके सामर्थ्य होते कि त्यांनी ह्या उभ्या कडा रात्रीत चढल्या आणि मग वर गेल्यावर खाली दोऱ्या सोडल्या मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन ‘सूर्याजी मालुसरे’ आणि ‘शेलारमामा’ यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता.
तिथे झालेल्या भीषण व जीवघेण्या लढाईत तानाजींना स्वराज्यासाठी त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. हे दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना समजले. या प्रसंगाची ते खूप दुखावले गेले होते. त्यांचा लहानपणीचा सवंगडी त्यांनी गमावला होता. यावर महाराज म्हणाले “गड आला पण सिह गेला”. अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या ‘उमरठे’ (पोलादपूरजवळ) या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता ‘मढेघाट’ या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा ‘वीरगळ’ स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version