तंत्र मटकी लागवडीचे….

आपण आपल्या आहारात कडधान्य नियमित सेवन केले पाहिजे. त्यात मटकी सारखे कडधान्य आपण दररोज खातो. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते. मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून आणि तिला आच्छादन करून वाढते. ते सुमारे ४० सेंमी उंच वाढते.

विदर्भासाठी मोट नं. ८८ (उत्पादन एकरी २-३ क्विंटल)
पश्‍चिम महाराष्ट्रासाठी एमबीएस- २७ (उत्पादन एकरी ३-४ क्विंटल) मोट नं. 88 हे वाण भुरी रोगास काही प्रमाणात बळी पडते, तर एमबीएस- २७ हे वाण भुरी रोगास काही प्रमाणात प्रतिकारक आहे.

मटकी येण्यासाठी जमीन मध्य प्रकारची , कमी पाणी धारण क्षमतेची, पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होणारी जमीन लागते. चोपण, क्षारयुक्त, पानथळ जमिनीत मटकीची लागवड करू नये. कमी पावसाच्या प्रदेशात या पिकाची लागवड मुख्यत्वे केली जाते.

जमिनीची मशागत खोल नांगरट करून पावसाच्या आगमनानंतर उभी – आडवी वखरणी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी एकरी ५-६ गाड्या कुजलेले शेणखत टाकून, काडी-कचरा- धसकटे इत्यादी वेचून शेत तयार ठेवावे.

मटकीची पेरणी साधारणतः ६०-७० मि. लि. पाऊस झाल्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत पेरणी करावी.
पिकाचा कालावधी ३.५ ते ४ महिन्यांचा आहे. ओलिताच्या शेतात रब्बी हंगामातील हरभरा अथवा गहू पीक घेण्यासाठी या पिकाची वेळेत पेरणी आवश्‍यक ठरते. उशिरात उशिरा ऑगस्टच्या मध्यापर्यंत या पिकाची लागवड करता येते.

पेरणीपूर्वी २ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बन्डाझिम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.

मटकीची पेरणी तिफणीने, सरत्याने, पाभरीने अथवा काकरीच्या साह्याने करतात. एकरी साधारणतः ५-६ किलो बियाणे पेरणीसाठी लागते.
पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व २ झाडांतील अंतर १० सें.मी. राखावे. पेरणीची खोली ३-४ सेंमी.राखावी.
सलग पेरणीसाठी मूग, उडीद, सोयाबीनप्रमाणे प्रत्येक चौथी, पाचवी अथवा सहावी ओळ खाली ठेवून, नंतर डवऱ्याच्या फेरीवेळी गाळ पाडून घ्यावा. अशा पट्टापेर पद्धतीमुळे उत्पादनात १५-२० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य होते.

पीक व्यवस्थित येण्यासाठी तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुरवातीचे ३०-४५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. पीक २० दिवसांचे व ३० दिवसांचे असताना डवऱ्याचा फेर द्यावा. यादरम्यान निंदणी करून ओळीतील तणांचा बंदोबस्त करावा.

पेरणी केल्यानंतर अथवा पेरतेवेळी एकरी ३० किलो डीएपी व साधारणतः १५ किलो एमओपी द्यावे.
पेरणी वेळी एकरी ८ किलो गंधक दिल्यास फायद्याचे ठरते. त्यामुळे पीक सुपीक येऊन त्याचा शेतकऱ्याला फायदाही होतो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा