मुंबई, २८ फेब्रुवरी २०२१: भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना पुणे येथे खेळला जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून परवानगी प्राप्त झाली आहे. तथापि, हा सामना प्रेक्षकांशिवाय खेळला जाईल. म्हणजेच एकदिवसीय सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षक येणार नाहीत. खरं तर, राज्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कसोटी, टी -२० मालिकेव्यतिरिक्त भारत आणि इंग्लंडला तीन एकदिवसीय सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. एकदिवसीय सामने पुण्यात होणार आहेत. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या सामन्यांचे ठिकाण बदलले जाण्याची बातमी होती. पण, आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात एकदिवसीय मालिका आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. तथापि, सामन्यादरम्यान खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित राहणार नाहीत.
भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर एकदिवसीय मालिका प्रेक्षकांशिवाय घेण्याचे ठरले. असोसिएशनने म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोविड प्रकरणात झालेली वाढ अजूनही चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय भारत-इंग्लंड वन डे मालिकेस परवानगी दिली आहे. यासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या आयोजनाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे