राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंग प्रकरणाला राजकीय रंग दिला जातो आहे- अनिल देशमुख

मुंबई, ३ ऑगस्ट २०२० : राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात येत असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्यातले पोलिस या प्रकरणाचा व्यावसायिकरित्या तपास करत आहेत आणि याप्रकरणी सत्य समोर आणण्यासाठी सर्व प्रयत्न करतील असं त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. बिहार पोलिसांनीही याप्रकरणी पाटण्यात एफआयआर नोंदवला असला तरी ज्या पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे, त्यांनी याप्रकरणी तपास करण्याची आणि खटला चालविण्याची गरज आहे. त्यामुळं सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला हा तपास सोपविण्याच्या मागणीचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तर याप्रकरणी मुंबई पोलिस तपासात बिहार पोलिसांना मदत करत नसल्याचा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केला आहे. राज्य सरकारच्या पथकाला अजून मुंबई पोलिसांकडून कुठलीही कागदपत्र मिळाली नसल्याचं बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंग राजपूत सोबत त्याच्या घरात राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा शोध बिहार पोलिस घेत आहे. त्याचं जबाब नोंदवून घेण्यासाठी त्याचा शोध सुरू आहे, मात्र अजून त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याचं बिहार पोलिसांनी सांगितलं. तो आढळून आला नाही तर त्याला नोटीस देऊ असं, पाटना विभागाचे पोलिस महानिरीक्षक संजय सिंग यांनी सांगितलं आहे.

राजपूत कुटुंबाकडून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती विरोधात जबाब नोंदवण्यासाठी दबाव येत असल्याची तक्रार पिठानी यानं दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना इमेल करुन केली होती. याप्रकरणी बिहार पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचं नेतृत्त्व करण्यासाठी पाटणा शहर मध्यचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी मुंबईकडे निघाले आहेत, असंही सिंग यांनी सांगितलं.

बिहार पोलिसांचं पथक आता सुशांतची जुनी व्यवस्थापक दिशा सलिनच्या कथित आत्महत्या प्रकरणाचाही तपास करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा