गोल पोस्ट महाराष्ट्र …तर मनरेगा ठरेल संजीवनी

…तर मनरेगा ठरेल संजीवनी

पुणे, दि.२ मे २०२० : कोरोनाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. तर कृषी बाजार समिती बंद असल्याने शेतीमालही पडून असल्याने शेतकरी दुहेरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.

कोरोनामुळे शेतीच्या कामाला विलंब होत आहे तर कोरोनाच्या भीतीने मजूरही कामावर यायला तयार नाहीत, अशा परिस्थिती मनरेगातून मशागतीची कामे करण्यास मंजुरी द्यावी. यामुळे गावात मजुरांना कामही मिळेल आणि शेतकऱ्यांना मदत होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. बाळासाहेब राख यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दीड महिन्यांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकारने शेती संबंधित कामांना सूट दिली असल्याचे घोषित केले असले तरी कोरोनाच्या भीतीने शेतीमधील कामे करण्यासाठी मजूर येत नाहीत.

शेतीच्या बांध बंदिस्तीपासून ते अंतर्गत मशागतीला परवानगी दिली तर शेतकऱ्यांना मदत होईल आणि गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आता सार्वजनिक विकासाची कामे रोजगार हमी योजनेतून सुरू होण्याची शक्यता कमी आहे. या संपुर्ण परिस्थितीचा विचार करता शेतीमधील मशागतीची कामे जर रोजगार हमीतून केली तर अनेक एक प्रश्न कमी होऊ शकतील. असा विश्वास बाळासाहेब राख यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे.

सरकारनं या विषयावर चर्चा करू नये. तत्काळ निर्णय घेतला तर अर्थव्यवस्थेत आलेली मंदी दूर करता येईल. अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होऊन उपासमार कमी होईल. पैसा बाजारात फिरत राहिल्यास कोरोना सदृश्य गंभीर परिस्थिती एक नवसंजीवनी मिळेल. अशी आशा व्यक्त केली जात आहे.


न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

error: Content is protected !!
Exit mobile version