मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यावरून राज्यभरात संतत्प प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट टाकून राज्यातील तीन इंजिनच्या सरकारवर तोफ डागली आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, नांदेडमधील सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्देवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली होती. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध जपून वापरा’ असा सल्ला दिला जात आहे, असे कळत आहे.
सरकारच्या तीन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये, पण महाराष्ट्राचे काय? दुर्देव असे की सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करुन महाराष्ट्राचे आरोग्य कसे सुधारेल, याकडे अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर