NEET and JEE pressure on students: या वर्षी 4 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेनंतर असे कळाले की, या वर्षीची नीटची परीक्षा ही मुलांना खूप अवघड गेली. पेपर देऊन बाहेर आल्यानंतर बरेच विद्यार्थी रडताना दिसले. नीट, जेईई, सीईटी या परीक्षांमुळे मुलांवर भरपूर ताण वाढत आहे. याचे कारण म्हणजे एकतर त्यांचा भरपूर वाढत चाललेला अभ्यास आणि त्यात शिक्षण व्यवस्थेत होणारे टायअप.
आधीतर समजून घेवूयात टायअप म्हणजे काय?
तर एखादं कॉलेज आणि खासगी कोचिंग यांच्यामध्ये एक व्यवहार केला जातो. त्या व्यवहारा नुसार काही कोचिंग सेंटर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात म्हणजेच JEE, NEET, CET, यांसारख्या परीक्षांमध्ये विशेष मार्गदर्शन किंवा क्लासेस देतात. यात मुलांना कॉलेजला जायची गरज नसते. केवळ क्लासेस करून विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि कॉलेजला केवळ परीक्षेसाठी जात असतात.
या टायअपचा सर्वात मोठा फटका हा पालकांना बसतो कारण या टायअप पद्धतीमुळे पालकांना कॉलेज आणि कोचिंग दोन्हीकडे फी भरावी लागते. टायअप कोचिंगची वेळ ही कॉलेजच्या वेळेपेक्षा जास्त असते. त्यामुळे विद्यार्थी कॉलेजला जाऊ शकत नाही. पालकांचा टायअप कोचिंगवर पूर्ण विश्वास असल्यामुळे ते कोचिंग वर पूर्णपणे अवलंबून राहतात आणि कॉलेजकडे गांभिर्याने लक्ष देत नाही, त्यासोबतच पालकांचे मुलांवरील लक्ष ही कमी होते. मग जेव्हा 12 वी च्या फायनल बोर्ड परीक्षेत मार्क्स कमी पडतात किंवा एखाद्या विषयात मुलगा – मुलगी फेल होतात तेव्हा मात्र पालक जागे होतात आणि त्यावेळी मग वेळ मात्र हातातून निघून गेलेली असते.
या टायअपचा सर्वात मोठा परिणाम हा त्या लहान मुलांवर होतो. टायअप आणि कॉलेज दोन्ही सांभाळणे हे मुलांसाठी अवघड जाते कारण टायअपमध्ये जो अभ्यासक्रम सुरू असतो तो आणि कॉलेजमध्ये जो अभ्यासक्रम चालू असतो तो दोन्हीमध्ये फार फरक असतो आणि तो अभ्यासक्रम कव्हरअप करणे विद्यार्थ्यांसाठी खूप अवघड जाते. अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि चांगले गुण मिळवणे यावर पालकांचा भर असतो, त्यामुळे पालकांची मागणी पूर्ण न करता आल्यामुळे बरेच विद्यार्थी आत्महत्येचा पर्याय निवडतात.
टायअप या विषयावर बऱ्याच कॉलेजेसचे प्राचार्य असे म्हणतात की, ‘टायअप ही पद्धत बंद झाली पाहिजे आणि कॉलेजेसमध्ये नीट आणि जेईईचा अभ्यासक्रम सुरु केला पाहिजे.’
कॉलेजमध्ये संगनमताने टायअपचा पर्याय का दिला जातो, खरंतर यावरही विचार व्हायला हवा..
ज्युनिअर कॉलेजेस किंवा सायन्स आणि कॉमर्स शाखा प्रदान करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे नीट आणि जेईई परीक्षांसाठीचे मुख्य टारगेट असतात. कॉलेज टायअपसाठी परवानगी देते कारण कोचिंग सेंटर्ससोबत भागीदारी केल्यामुळे कॉलेजांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. याचा फायदा कॉलेज स्वतःचे आर्थिक बळ वाढवण्यासाठी करतो विद्यार्थ्यांच्या प्रगती साठी नाही.
महाराष्ट्र क्लास असोसिएशनने 2015मध्ये बॉम्बे हाय कोर्टात तक्रार नोंदवली होती. यावर 2016 मध्ये कोर्टाने जे टायअपसाठी परवानगी देत आहेत. अशा कॉलेजेसवर कठोर कारवाई केली जाईल, असे आदेश ही दिले होते.
पुढे काय झाल ?
तर 2025 मध्ये, बॉम्बे उच्च न्यायालय अजूनही महाराष्ट्र क्लास असोसिएशनने 2015 मध्ये दाखल केलेल्या कॉलेज आणि कोचिंग सेंटर टायअपबाबतच्या तक्रारीवर काम करत आहे; पण 2024 मध्ये केंद्र सरकारने कोचिंग सेंटर्ससाठी नवीन कायदे जाहिर केले आहेत. या नियमानुसार, 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी प्रवेश दिला जाणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येइल. मात्र, हा कायदा 16 वर्षांपर्यंत मर्यादित न करता हा नियम 18 वर्षांपर्यंत लागू करणे आवश्यक आहे.
जर कॉलेजेसमध्ये जेईई आणि नीटच्या अभ्यासक्रमाचे नियोजनबद्ध शिक्षण दिले गेले, तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोचिंग सेंटर्सकडे जाण्याची गरज भासणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यवर सकारात्मक परिणाम होईल. म्हणूनच, सरकारने हा नियम 18 वर्षांपर्यंत वाढवावा यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होईल आणि त्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक सकारात्मक बनेल.
या टायअपवरती एकच पर्याय आहे तो म्हणजे कॉलेजेसने नीट आणि जेईईचा अभ्यासक्रम शिकवायला सुरू केला पाहिजे आणि टायअप साठी पूर्ण पणे नकार दिला पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे. मुलांवरचा ताण त्यांच्या पालकांनी ही लक्षात घेतला पाहिजे. पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक मुल हे वेगळे असते. इतर मुलांसोबत त्यांची तुलना करणे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला धोकादायक असते आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलाप्रमाणे त्यांचे करिअर त्यांना निवडू दिले पाहिजे .. अन्यथा या वाढत्या आत्महत्तेला तेही तितकेच जबाबदार ठरतील याचा विचार व्हायला हवा.
टायअप पद्धतीमुळे पालक, कॉलेज आणि विशेषतः विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे पालकांचा आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो, कॉलेजांची उपस्थिती आणि विश्वासार्हता कमी होते, तर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा आणि पालकांच्या अपेक्षांचा प्रचंड दबाव येतो, ज्यामुळे काहीवेळा आत्महत्येसारख टोकाच पाऊल विद्यार्थ्यांकडून उचलले जाते. टायअप बंद करून कॉलेजांनी नीट, जेईई यांसारख्या परीक्षांचा अभ्यासक्रम स्वतः शिकवावा, कठोर कारवाई करावी आणि पालकांनी मुलांच्या वैयक्तिक क्षमतांचा आदर करून त्यांच्यावर अवास्तव दबाव टाळावा, हाच यावर उपाय आहे…
बाकी शिक्षण व्यवस्थेबद्दलच्या या व्यापरीकरणावर तुमच मत काय आहे?
न्यूज अनकट प्रतिनिधी, जुई काळे