पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक ४ ते १५ जुलैपर्यंत, मर्यादीत कालावधीसाठी बंद राहणार

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाचा असणाऱ्या चांदणी चौकातील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. काही दिवसासांठी ही वाहतूक बंद असली तरी पुणेकर नागरिकांना भविष्यात यामुळे चांगल्या सुविधा मिळणार आहेत. येत्या ४ ते १५ जुलैपर्यंत महामार्गावरील वाहतूक मर्यादीत कालावधीसाठी बंद राहणार आहे. चांदणी चौकात होणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलासाठी गर्डर उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

पुणे मध्ये मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात उड्डाण पुल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे गर्डर उभारणीचे काम ४ ते १५ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात येणार आहे. हे काम रात्री १२.३० ते पहाटे ३.३० दरम्यान करण्यात येणार आहे. यामुळे तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक महामार्गालगत असणाऱ्या पर्यायी रस्त्यांवर म्हणजे साईड रोडने वळवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पाचे काम ९५% पूर्ण झाले आहे. एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे काम सबस्ट्रक्‍चपर्यंत करण्यात आले आहे. यामुळे मुख्य महामार्गावरील वाहतूक रात्री तीन तास बंद करुन पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये तीन तासांसाठी मल्टी ऍक्‍सेल वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. यावेळी मुंबई-पुणे एक्‍सप्रेस-वे, तळेगाव टोल नाका आणि मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणीच मल्टी ऍक्सेल वाहने थांबवली जातील. तसेच साताऱ्याकडून येणारी वाहने खेड शिवापूर टोल नाका येथे थांबवण्यात येणार आहेत. परंतु हलकी वाहने, बस आणि ट्रक पर्यायी रस्त्याचा वापरु शकणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा