उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी साधला संवाद

परीक्षेसंदर्भातील संभ्रम केला दूर

मुंबई, दि. ८ मे २०२०: राज्यातील विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. त्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा १ ते ३० जुलै दरम्यान घेण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

समितीने दिलेल्या अहवालाविषयी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेण्यात आला. राज्यात कोरोना व्हायरस ची परिस्थिती अशीच राहिली व लॉक डाउन वाढले तर पुन्हा २० जूनपर्यंत याविषयी फेरआढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. परीक्षा होणार नसलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांचे ग्रेड्स व मार्क्सही त्यांना दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारी ५० टक्के ग्रेड ही अंतर्गत मुल्यमापनावर आधारित व ५० टक्के या पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षांबाबत १०० टक्के अंतर्गत मूल्यमापन केले जाईल. या गुणांबाबत शंका असल्यास, त्यामध्ये मुल्यवर्धन करण्याची इच्छा असल्यास विद्यार्थ्यास ऐच्छिक परीक्षा देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परीक्षांमध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल. पण, त्यांना नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या विषयीच्या वेळापत्रकाचे निर्णयही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणार आहे. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असल्याचे सामंत यांनी सांगितले.

विद्यार्थी, पालकांच्या शंकाचे निरसन व समुपदेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी जुलैच्या परीक्षा नजरेसमोर ठेऊन अभ्यास सुरू करावा. याचबरोबर परीक्षा होणार नसलेल्या विद्यार्थ्यांनी सुट्टी आहे, अभ्यास नाही म्हणून घराबाहेर पडू नय अशी सूचना देखील सामंत यांनी दिली.

उन्हाळी सुट्टीबाबत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा विचार करून प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीने विभागाचे काम सुरू करण्याचे सांगण्यात आले.

समितीच्या अहवालास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची सहमती आहे. लॉक डाउन काळात विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये उपस्थित असल्याचे गृहित धरून नोंद घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता अभ्यासावर व शैक्षणिक सत्रांवर लक्ष केंद्रित करावे अधिसूचना त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

स्वायत्त विद्यापीठांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्यात. चार वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची, तर पाच वर्षाचा कोर्स असणाऱ्यांना १० व्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल. तसेच ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा वार्षिक होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येईल. दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची परीक्षा होईल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा