मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युतीच राज्यात सत्ता स्थापन करणार, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरीही भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. पण त्याचवेळी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपच्या तिकिटावर उभा असलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे उदयनराजेंचं राजकीय भवितव्य काय असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताना उदयनराजेंनी दोन अटी ठेवल्याची चर्चा होती. त्यातील पहिली अट म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेणे आणि दुसरी म्हणजे लोकसभेत पराभव झाल्यास राज्यसभेवर पक्षाने नियुक्ती करणे. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपकडून उदयनराजेंना संधी मिळणार का, याबाबत चर्चा होत आहे. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
‘उदयनराजेंचा पराभव आमच्यासाठी अनपेक्षित आहे. त्यांचा पराभव झाला असला तरी पक्षसंघटना त्यांची योग्य ती काळजी घेईल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजेंना दिलासा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात उदयनराजेंना भाजपकडून मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.