उद्योजकांना केंद्र सरकारची भीती वाटणे चिंताजनक बाब: रोहित पवार

मुंबई: काही दिवसांपूर्वी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी सरकारवर टीका केली होती. “यू पी ए च्या काळात सरकारला टीका करण्याचं स्वातंत्र्य होतं. सध्या मात्र सरकारला टीका सहन होत नाही. लोक सरकारला प्रश्न का विचारू शकत नाहीत?” असा सवाल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना केला होता. उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका करताना हे सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत असल्याचं म्हटलं होते.
यावर रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “राहुल बजाज यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे. केंद्र सरकारमधील मंत्री सांगत आहेत, त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहीत आहेत, आपल्या अनुभवाच्या जोरावर या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय देखील हे लोक सुचवू शकतात”. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “सरकार आणि उद्योगपती यांच्यात जर चांगला संवाद असेल, धंद्यासमोरच्या खऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची सरकारची तयारी असेल तर देशाच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळू शकते पण यासाठी गरज आहे ती उद्योगपतींशी संवाद साधण्याची, त्यांची बाजू ऐकून घेण्याची. मला एकच भीती वाटते ती म्हणजे, आपल्यावरील टीका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको”.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा