Tomato and leafy vegetable prices soar : मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे, पण या पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. विशेषतः टोमॅटो आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे बाजारात भाज्यांचे दर कडाडले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये टोमॅटोचा चिखल झाला आहे, ज्यामुळे टोमॅटोचे पीक पूर्णपणे हातातून गेले आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे भाव ५० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. पालेभाज्याही आता ४० रुपये प्रति जुडीने मिळत आहेत. गवारचे भाव अजूनही चढेच असून, गावरान गवार १०० रुपये तर सुरती गवार १२० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. वाटाणा आणि राजमा यांसारख्या शेंगांच्या भाज्यांचे भावही १४० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. एकीकडे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पन्नाचा स्रोत थांबला आहे, तर दुसरीकडे बाजारात भाज्यांचे भाव वाढले असले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही.
व्यापारी आबासाहेब रायकर यांच्या मते, “मे महिना संपायला पंधरा दिवस बाकी असतानाच आलेल्या या अवकाळी पावसामुळे टोमॅटोचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे, तर भाजीपाल्याला सर्वत्र हानी पोहोचली आहे. दरम्यान, बाजारात जांभळांची एंट्री झाली आहे. सध्या ३०० रुपये प्रति किलो दराने विकली जाणारी जांभळे येत्या काही दिवसांत आवक वाढल्यास स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच, उन्हाळ्यात लोणच्याच्या कैरीला मोठी मागणी आहे, ज्यामुळे कैरीचा भाव ७० ते ८० रुपये प्रति किलो आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे