नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर २०२० : उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे की, स्वच्छतेत निष्काळजी पणा केल्यास कुपोषण होते आणि रोगांच्या संसर्गाचा धोका वाढतो. जागतिक शौचालय दिनानिमित्त उपराष्ट्रपतींनी ट्विट संदेश जारी केला.
त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आरोग्य संपन्न समुदाय आणि आरोग्य संपन्न राष्ट्रासाठी स्वच्छता आणि साफसफाई याला प्राधान्य असलं पाहिजे. त्यांनी लोकांना भारत उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्याचा संकल्प पुन्हा करण्याचं आवाहन केलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जागतिक शौचालय दिनानिमित्त बोलताना, भारतानं सर्वांसाठी शौचालयं हा निर्धार आणखी मजबूत केल्याचं सांगितलं. एका ट्विट संदेशात त्यांनी हे म्हटलं की, गेल्या काही वर्षात कोट्यवधी भारतीयांना स्वच्छ शौचालय पुरवण्यात मोठे यश साध्य केल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे विशेषतः आमच्या महिलांना प्रतिष्ठेसह आरोग्यविषयक प्रचंड लाभ झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: