खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव-गुळाणी रस्त्याच्या संथगती कामामुळे गेल्या चार महिन्यांपासून एसटी बससेवा पूर्णपणे थांबली आहे. यामुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, त्यांनी तात्काळ सेवा पूर्ववत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. रस्त्यावर खडी पसरलेली असल्याने बसचे टायर खराब होतात, असे कारण देत बसस्थानक प्रमुखांनी सेवा बंद केल्याचे सांगितले आहे.
परिणामी, राजगुरुनगरच्या महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. खासगी वाहनांचा वापर करूनही त्यांना २-३ किलोमीटर पायी चालावे लागत आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याच्या भीतीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. माजी सरपंच संतोष गार्डी यांनी एसटी सेवा सुरू करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले