गोल पोस्ट राजकारण बीआरएस मध्ये गेलेल्या या नेत्यांची आता भूमिका काय?

बीआरएस मध्ये गेलेल्या या नेत्यांची आता भूमिका काय?

मंगळवेढा, सोलापूर ४ डीसेंबर २०२३ : पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात जबरदस्त एन्ट्री करणारे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री तसेच बी आर एस पक्षाचे नेते के चंद्रशेखर राव यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. तेलंगणात त्यांची सत्ता गेली. त्यांनी तेलंगणा राज्यात राबविलेल्या योजनांवर आणि त्यांच्या क्रेझवर प्रभावित होऊन सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी बी आर एस मध्ये प्रवेश केला होता, मात्र आता निकालांनंतर त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. आता हे नेते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

के सी आर यांनी सोलापूर जिल्ह्यात धमाकेदार एन्ट्री करत पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यांच्यावर प्रभावी होऊन माजी आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये दिमाखात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत आला होता. यावेळी आपल्या भाषणातून केसीआर यांनी महाराष्ट्राला समृध्द करण्याचे स्वप्न दाखवले. त्यानंतर त्यांचा प्रभाव सोलापुरात आणखीच वाढला. भारतीय जनता पार्टीतील सत्ताधारी नगरसेवकांनी हैदराबाद मध्ये जाऊन बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये नागेश वल्याळ, राजश्री चव्हाण, संतोष भोसले, जुगनबाई आंबेवाले यांच्यासह पद्मशाली समाजात मोठं प्रस्थ असलेले पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांचा समावेश होता.

त्यानंतर बी आर एस पक्षाची क्रेझ ग्रामीण भागात ही पाहायला मिळाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक सरपंच आपल्या असंख्य गाड्यांच्या ताफ्याने हैदराबादला जाऊन प्रवेश करत होते. बी आर एस च्या माध्यमातून अनेकांना सत्तेचे स्वप्न पडले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः केसीआर यांचा पराभव झाला आणि बी आर एस ची सत्ताही गेली. पक्षांतर केलेल्या या मोठ्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले. त्यामुळे आता त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : दगडू कांबळे

error: Content is protected !!
Exit mobile version