राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेत फूट पडणार? तुपकर वेगळी चूल मांडण्याची शक्यता

बुलढाणा, ३ऑगस्ट २०२३ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यात मागच्या काही दिवसांपासून बिनसल्याचे समजते. विशेष म्हणजे दोन नेत्यांमध्ये नेहमी खटके उडत असल्यामुळे रविकांत तुपकर हे वेगळी चुल मांडण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक मोर्चा झाला. त्यावेळी त्या मोर्चाला राजू शेट्टी आले होते. राजू शेट्टी त्या मोर्चाला आल्याने रविकांत तुपकर यांनी त्या मोर्चाकडे पाठ फिरवली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. त्याचबरोबर बुलढाण्यात राजू शेट्टी असताना रविकांत तुपकर यांनी भेट घेतली नाही. तेव्हापासून शेतकरी संघटनेत फूट पडणार का? या चर्चेने जोर धरला आहे.

रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यात मागील काही काळापासून पटत नाही. त्यामुळे संघटनेतच नव्हे, तर बाहेर ही याची चर्चा आहे? रविकांत तुपकर हे बंड करण्याच्या तयारीत आहेत. नुकताच बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा मोर्चा झाला. मात्र राजू शेट्टी आले असताना तुपकर त्याठिकाणी आले नाहीत. त्यामुळे तुपकर यांची नाराजी उघड झाली. विशेष म्हणजे तुपकर राजू शेट्टी यांना भेटायला सुद्धा आले नाहीत. त्यामुळे संघटनेत फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. काल तातडीची जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी तुपकर यांनी संघटना कोणाची खाजगी मालमत्ता नाही, असे म्हणत संघटनेवर दावा केला की काय ? अशी चर्चा सुरू झाली आहे. फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वाघाची शिकार होत नाही, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा कार्यकर्त्यांसोबत मोठी आंदोलने केली आहेत. त्यामुळे ते मागच्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. रविकांत तुपकर यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर संघटनेत फुट पडणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा