तुमची गरज संपली, आता गाशा गुंडाळा, संजय राऊत यांचा शिंदे गटाला टोला

मुंबई,६ जुलै २०२३ : महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या नाट्यमय बदलानंतर नवीन समीकरणे तयार झाली आहेत. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकरामध्ये सामील झाल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर मंत्रिपदावरून शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बहुमतासाठी १७० चा आकडा असतानाही भाजपने राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा गट नव्याने सरकारमध्ये सामील केला आहे. याचा अर्थ असा आहे की, तुमची गरज संपली. आता तुम्ही गाशा गुंडाळा. अजित पवारांच्या ९ मंत्र्यांना तातडीने शपथ दिली जाते. पण, मंत्रिपदासाठी वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांना शपथ दिली जात नाही. याचाच अर्थ शिंदे गटाची आता गरज संपली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था तर अतिशय केविलवाणी झाली आहे. स्वाभिमान असेल आणि जुनी वक्तव्य आठवत असतील, तर छगन बुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. त्यांनी बाळासाहेबांना अटक केली, अजित पवार यांच्यामुळे आम्ही पक्ष सोडला म्हणणाऱ्यांनी आता राजीनामे द्यावेत. कारण मांडीला मांडी लावून नाही तर ते आता तुमच्या मांडीवरच येऊन बसले आहेत, असे राऊत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा