१०८ रुग्णवाहिकेने नऊ वर्षात वाचवले अडीच लाख रुग्णांचे प्राण

जळगाव , १६ ऑक्टोंबर २०२३ : रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकेमुळे, गेल्या नऊ वर्षात जळगाव जिल्ह्यातील दोन लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत. हृदयविकाराचे रुग्ण, अपघात ग्रस्त व्यक्ती, गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५१ हजार ५०३ महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले असून ११८ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी, १०८ आपत्कालीन रुग्ण सेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रुग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रुग्णवाहिकांनी करावे, या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्याने दिल्या.

याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर राहुल जैन, जिल्हा समन्वयक अतिश सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर १०८ रुग्णवाहिकेच्या रुग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली. कोरोना काळात देखील १०८ रुग्णवाहिकेने मोलाची भूमिकांनी बजावली असून या रुग्णवाहिकेमध्ये कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधी, शॉक मशीन, ऑक्सिजन सिलेंडर सोबत डॉक्टर उपलब्ध राहत असल्यामुळे आरोग्य विभागावरील बराच ताण कमी झाला आहे. राज्यात २०१४ पासून सप्टेंबर २०२३ पर्यंत ९१ लाख २१ हजार ९७४ रुग्णांना रुग्णवाहिकेमुळे जीवनदान मिळाले आहे.

कोरोना काळात ३५ रुग्णवाहिकांनी १५ हजार ७९३ कोविडच्या रुग्णांना सेवा दिली आहे. एक लाख१६ हजार ९१६ रुग्णांसाठी मार्च २०२० ते सप्टेंबर २०२३दरम्यान सेवा बजावली आहे. तसेच विविध आजारांच्या ६४ हजार ४८५ रुपयांना रुग्णवाहिकेने सेवा दिली आहे. जळगाव जिल्ह्यात २०१४ पासून ते आतापर्यंत अपघातग्रस्त २० हजार ६२५ रुग्ण तसेच हाणामारीचे चार हजार ४१५ रुग्णांना तर एक हजार जळीत रुग्णांना त्याचप्रमाणे छातीत दुखणे, उंचावरून पडणे, विषबाधा झालेले अशा १२,६४६ रुग्णांना इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या ३२५ रुग्णांना, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या येथील १३१ रुग्णांना आणि ७९५ मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे.

वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला त्वरित आरोग्य सेवा मिळावी यासाठी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था व एनएचएम महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने १०८ रुग्णवाहिका सुरू असून आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत असल्याचे डॉक्टर राहुल जैन यांनी सांगितले. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत ही सेवा तातडीच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८या मोफत मदत क्रमांकावर संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८च्या सुसज्ज आणि अद्यावत नियंत्रण कक्षा आधारे रुग्णांपर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक तसेच तातडीचे उपचार ही १०८मध्ये उपलब्ध होऊन रुग्णांचा जीव वाचतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा