मुंबई: मुंबईतील वरळीत भरधाव बीएमडब्ल्यू कार डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वरळीतील मेला रेस्टॉरंट जंक्शनवर हा अपघात झाला आहे. कार भरधाव वेगाने चालवत असताना अचानक कार स्पीड ब्रेकरवर चढली आणि कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. डिव्हायडरला वेगाने आदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये एक सहा महिन्यांची मुलगी, ७०v वर्षांची महिला व ६२ वर्षीय एक व्यक्ती यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार भरधाव चालली होती. कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे व तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी महिलेचे नाव नमिता चंद असे असून त्यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नमिता या अंधेरीतील राहणाऱ्या आहेत, असे सांगण्यात आले. यामध्ये त्यांची आई व नातेवाईक मृत्यू पावले आहेत तर त्यांची एक सहा महिन्यांची मुलगी मृत झाली आहे.