उस्मानाबाद : ‘मुख्यमंत्री साहेब, आमच्या पप्पांची फसवणूक झाली. ते आत्महत्या करतील असे वाटत आहे. त्यांच्यावरचे संकट दूर करा.’ असे पत्र जि.प.प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या धनश्रीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा पत्र लिहिताना केलेले भावनिक आवाहन केले आहे.
देवळाली येथील आश्रुबा पांडुरंग बिक्कड यांनी कडकनाथ कोंबड्या देण्याच्या व्यवहारात एका कंपनीकडून ४ लाखांची फसवणूक झाली. यामुळे घरात तणावाचे वातावरण आहे. सातत्याने चिडचिड, आईवडिलांचे वाद होत आहेत. याचाच परिणाम त्यांची मुलगी धनश्री हिच्यावर झाला. यावर तिने हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
मुख्यमंत्री साहेब आपणास सा. नमस्कार…
”सर्वात पहिले तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, माझे नाव धनश्री आश्रुबा बिक्कड. शाळा देवळाली येथे शिकत आहे. साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत.
पण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्या वेळेस पाऊस नसतो. मग शेतात काही धान उगवत नाही. पप्पा नेहमी टेन्शनमध्ये असतात, मम्मीवर रागावतात. माझ्यावर चिडतात.
त्यांच्या तोंडून एकच शब्द निघतो. कडकनाथ कोंबडीच्या घोटाळ्यात लई पैसे अडकले, नेहमी मेलेले बरे याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे सारखे बोलतात. साहेब मला लय घाबरायला होते. मला फार भीती वाटते. आमच्या शाळेत वाचण्यासाठी पेपर येतो. त्यात पण शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बातम्या येतात. साहेब आमच्या पप्पाला तुम्ही समजून सांगा”.











































