इंदापूर, दि. १७ जुलै २०२०: तालुक्यातील नागरिकांनी कोरोणा या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, शासनाने घालून दिलेले नियम तंतोतंत पाळत, तोंडाला मास्क व स्वच्छता, सुरक्षित अंतर याचे पालन करावे. जर नागरिकांनी खबरदारी व्यवस्थित घेतली तर इंदापूर तालुका सद्यस्थितीला लॉक डाउन करणार नाही अशी ग्वाही सर्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर येथील शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकार्यांची आढावा बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे दिलीपराव पवार, तर भिगवण पोलीस स्टेशनचे जीवन माने, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे पाटील, यांच्यासह तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम पंचायत समिती महसूल विभाग कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इंदापूर शहरातील व ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्यांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच सॅनिटायझर चा वापर करण्यात आला पाहिजे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जावी. पंचायत समितीच्या आरोग्य विभागासह इतर कर्मचाऱ्यांनी कोरोना आजाराचा ग्रामीण भागात कोठेही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दक्ष राहून काम करणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात एकूण ३२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र हे सर्व रुग्ण ठणठणीत बरे होतील असा विश्वास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
यावेळी इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर म्हणाले की विना मास्क करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या सद्यस्थितीला कमी झाले आहे. तसेच शहरातील काही भागात पानटपऱ्या सुरू आहेत, या संबंधित कालावधीसाठी बंद केल्या जातील कोणीही सार्वजनिक अथवा इतर ठिकाणी गर्दी करु नये. विना मास्क फिरू नये यासाठी पोलीस यंत्रणा काम करीत आहे.अशीही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे