मुंबई, ७ नोव्हेंबर २०२०: शुक्रवारी फारूक अब्दुल्ला यांनी विरोधकांवर टीका करत असं म्हटलं होतं की, जे आम्हाला पाकिस्तानात जा म्हणत आहे त्यांनी पाकिस्तानात जावं, हा आमचा देश आहे आणि हे जम्मू कश्मीर सुद्धा आमचं आहे. हिंदुस्तान हा गांधींचा हिंदुस्तान आहे, भाजपचा नाही, असं अब्दुल्ला म्हणाले. आम्हाला आमच्या जम्मू आणि काश्मीरचा जुना दर्जा परत हवा आहे, असं देखील फारूख अब्दुल्ला म्हणाले. यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हवं असल्यास फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावं.”
काय म्हणाले फारूक अब्दुल्ला
फारूख अब्दुल्ला म्हणाले की, ‘आम्हाला जायचे असतेच तर आम्ही १९४७ सालीच पाकिस्तानात गेलो असतो. त्यावेळी आम्हाला रोखणारे कोणीच नव्हते. मात्र आम्ही भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आणि हा आमचा देश आहे. आमचा देश गांधींचा आहे, भाजपचा नाही.’
भारतीय जनता पक्ष देशाची दिशाभूल करत असून जम्मू आणि काश्मीरसह लडाखच्या लोकांना खोटी आश्वासने देतो, असे फारूख अब्दुल्ला म्हणाले. आपल्या लोकांचे हक्क जोपर्यंत मी परत मिळवत नाही, तो पर्यंत मी मरणार नाही… मी येथे लोकांचे काम करण्यासाठी आहे. ज्या दिवशी माझे काम संपेल त्या दिवशी मी येथून निघून जाईन असे फारूख अब्दुल्ला म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे