सातारा : पुणे -सातारा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डे दुरुस्तीबाबत प्रशासनाला निवेदन देऊनही १५ दिवसांचा कालावधी उलटला. परंतु तरीही प्रशन्सने कोणतीही दखल घेतली नाही. या पार्शवभूमीवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा धिकारी श्वेता सिंघल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
येत्या १५ दिवसांत खड्डे भरून खराब रस्त्यांचे कार्पेटींग केले जाईल. तसेच सेवा रस्त्यांचीही दुरूस्ती केली जाईल, असा शब्द महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला. पण दिलेल्या मुदतीत काम झाले नाही तर १६ व्या दिवशी आनेवाडी टोलनाका बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवेंद्रसिंहराजेंनी दिला.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.त्यामुळे या महामार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करत शिवेंद्रसिंहराजे यांनी टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा ९ नोव्हेंबरला दिला होता.
रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्ती आणि आवश्यक सोयी- सुविधा पुरवण्याबाबत चर्चा केली होती.
त्यानंतर मंगळवारी(दि.१९) रोजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह टोल विरोधी जनता समुहातील सर्व सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चिटणीस, रिलायन्स कंपनीचे गांधी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, आणेवाडी टोलनाका येथून २० किलोमीटर परिघात येणाऱ्या सर्व गावातील वाहनचालकांना सवलत पास देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या सर्व गावातील वाहनचालकांनी सवलत पास घेतले नसतील तर ते घ्यावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या लोकांना सवलत पास तातडीने द्यावेत.