किल्ल्यांनी जपला….ऐतिहासिक वारसा

                                              भुदरगड

“कोल्हापूरपासून भुदरगड हा साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती. पण आज रोजी गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधून झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.”

हा किल्ला अजुनही चांगल्या स्थितीत असलेला आहे. भुदरगड हा शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला.१६६७ मधे शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक हल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही देवळात आहेत.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुराम भाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला.

इ.स.१८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. १३ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला. असे बंडाचे प्रयत्‍न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली.

गडावर जाण्यासाठी गारगोटी वरून पाल बार्वे मार्गे किंवा गारगोटी वरून पुशपनगर राणेवाडी मार्गे जाता येते. पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. पूर्वी पेठ शिवापूर ही बाजारपेठ होती. वाटेत महादेवाचे मंदीर व त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदीर दिसते. मंदीराभोवती ओवर्‍या, कमानी व दिपमाळा आहेत.मंदीरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे.

देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले पुरातन शिवमंदीर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.

वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदीर मंदीरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदीर लागते. मंदीरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.
गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.
गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरुन दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो. गडाच्या सर्व बाजूनी वनीकरण केल्यामुळे हा गडाखालील परिसर सदैव हिरवागार दिसतो.
गडाखाली पेठ शिवापूर, गडबिद्री, जकींनपेठ, शिंदेवाडी, कदमवाडी, वरेकरवाडी, राणेवाडी, माडेकरवाडी, कालेकरवाडी, घावरेवाडी, चोपडेवाडी, पडखंबे, बारवे अशी छोठी गावे आणि वाडी आहेत.

शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची मजबूत तटबंदी केल्याने हा किल्ला आजही मजबूत स्थितीत उभा आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा