नवी दिल्ली, ५ मार्च २०२३ : लंडन दौऱ्यावर गेलेले काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला आहे. मोदी स्वतः भारताचा अपमान करतात. त्यांनी माझ्या आजी-आजोबांचाही अपमान केला आहे. केंब्रिज येथील व्याख्यानमालेत आपण काहीही चुकीचे बोललो नाही, असे स्पष्ट करीत भाजपला तोडून फोडून गोष्टी सांगणे आवडते, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.
भारताची बदनामी केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर भाजपने केला आहे. या आरोपांना लंडनमधील इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्वतः म्हटले आहे की, गेल्या ६०-७० वर्षांत काहीही केले नाही. असे म्हणून मोदी यांनी प्रत्येक भारतीय आणि त्यांच्या आजी-आजोबांचा अवमान केला आहे.
राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लबोल करताना सांगितले की, भारतातील सर्व संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. माझे फोन टँपिंग केले जात आहेत. भारतात मीडिया आणि न्यायव्यवस्था नियंत्रणात आहे. माझ्या फोन रेकॉर्डवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. तुमचा फोन रेकॉर्ड होत असल्याची माहिती मला गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिल्याचे गांधी यांनी सांगितले. माझ्यावर फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर