अलिबाग, २२ जुलै २०२३ : इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४ वर पोहचला असुन अद्याप अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुर्घटनेतून बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज नढळ येथे दुर्घटनेतील पीडितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीने, त्यांनी पालकत्व स्वीकारल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी आमदार मनिषा कायंदे, आमदार महेंद्र थोरवे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.
या मुलांशी संवाद साधताना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुलांना शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले. काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याकरिता स्वतःचा नंबर अनाथ मुलांना दिला. तसेच गावातील स्थानिक व्यक्ती ज्याला आपण सर्व ओळखता त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही मुलांना केली. १ ते १८ वयापर्यंतचे ३१ मुल-मुली असून त्यापैकी २१ जण आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर