नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीविरोधात ईशान्य भारत व त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराचे लोण आता दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत.
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान काही समाजकंटकांनी दिल्ली पर्यटन महामंडळाच्या ३ बस पेटवून देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत ६ पोलिस जखमी झाले. दरम्यान पश्चिम बंगालमधील ५ जिल्ह्यांतही हिंसाचार घडल्याने तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंसाचार खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आज दिल्लीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.










































