Election for Shri Sant Tukaram Sugar Factory: श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. विक्रमी २२६ उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ५ अर्ज बाद झाले, तर २६ उमेदवारांनी दुबार अर्ज भरल्याने ते देखील रद्द करण्यात आले. त्यामुळे १९५ उमेदवार रिंगणात राहिले. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब ऊर्फ विदुरा नवले यांच्या नेतृत्वाखालील श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलने सर्वपक्षीय उमेदवारांची यादी जाहीर केली.
या यादीत हिंजवडी-ताथवडे गटातून विदुराजी विठोबा नवले, चेतन हुशार भुजबळ, दत्तात्रय गोपाळ जाधव, पौड-पिरंगुट गटातून धैर्यशील रमेशचंद्र ढमाले, यशवंत सत्तू गायकवाड, दत्तात्रय शंकरराव उभे, तळेगाव-वडगाव गटातून बापूसाहेब जयवंतराव, ज्ञानेश्वर सावळेराम दाभाडे, संदीप ज्ञानेश्वर काशीद, सोमाटणे-पवनानगर गटातून छबुराव रामचंद्र कडू, भरत मच्छिंद्र लिम्हण, उमेश बाळू बोडके, खेड-शिरूर हवेली गटातून अनिल किसन लोखंडे, विलास रामचंद्र कातोरे, अतुल अरुण काळजे, धोंडिबा तुकाराम भोंडवे, महिला राखीव गटातून ज्योती केशव अरगडे, शोभा गोरक्षनाथ वाघोले, अनुसूचित जाती/जमाती गटातून लक्ष्मण शंकर भालेराव, इतर मागासवर्ग गटातून राजेंद्र महादेव कुदळे, आणि विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातून शिवाजी हरिभाऊ कोळेकर यांचा समावेश आहे.
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने, रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्याकडून छाननी प्रक्रिया सुरू होती. बुधवारी (दि. २६) ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे