लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ शिवारात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

लातूर, २० फेब्रुवारी २०२३ : चिंचोली बल्हाळनाथ (ता. लातूर) शिवारातील एका विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) उघडकीस आली. यातील मृत मुलीचे वय १५ वर्षे तीन महिने असून, ती दहावीच्या वर्गात शिकत होती. ती गोविंदनगर वसवाडी येथील रहिवासी असल्याचे समजते. तर मुलाची अद्याप ओळख पटलेली नाही. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीबाहेर काढले असून, गातेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

लातूरच्या गोविंदनगर वसवाडी येथील दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी १५ फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. याबाबत लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलीच्या नातेवाइकांनी मुलगी पळविल्याची तक्रार दाखल केलेली होती. आणि १७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी चिंचोली येथील एक महिला पाणी भरण्यासाठी शिवारातील आत्माराम जाधव यांच्या विहिरीवर गेली असता विहिरीबाहेर मुलाची चप्पल व मुलीचे दप्तर दिसल्याने रमेश सरवदे यांनी गातेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावकर्‍यांच्या मदतीने पोलिसांनी मुलीचा मृतदेह विहिरीबाहेर काढला; पण रात्रीचा अंधार असल्याने मुलाचा मृतदेह सापडला नव्हता. शनिवारी (ता.१८) दुपारी तीनच्या दरम्यान मुलाचा गाळात अडकलेला मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले. मुलीची ओळख पटली असून मुलाची अद्याप ओळख पटलेली नाही. रमेश सरदवे यांनी दिलेल्या माहितीवरून गातेगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक एन. एन. कांबळे हे अधिक तपास करीत असल्याचे आज पोलिसांनी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा