हातखंबा येथे ट्रकला ट्रकची मागून जोरदार धडक; अपघातानंतर दोन्ही ट्रक जळून खाक

रत्नागिरी, १९ डिसेंबर २०२२ : रत्नागिरीतील हातखंबा येथे दोन ट्रकचा सोमवारी (ता. १९) सकाळी भीषण अपघात झाला. हातखंबा गावात उतारावरून भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला धडक दिली आणि या धडकेनंतर दोन्ही ट्रकनी पेट घेतला. दोन्ही ट्रकमधील चालकांना गावातील तरुणांनी जिवाची बाजी लावत वाचवले.

साखरेची वाहतूक करणारे दोन्ही ट्रक असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे. हातखंबा गावात उतारावरून येणाऱ्या ट्रकने आधी दुचाकीला धडक दिली आणि नंतर पुढील ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की ट्रकच्या टायरने पेट घेतला आणि दोन्ही ट्रक एकाचवेळी पेटले. गावातील मुन्ना देसाई मित्रमंडळाच्या तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अग्निशमन यंत्रणा तत्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी माजी नगरसेवक निमेष नायर यांच्याशी संपर्क साधण्यात आला, तर आगीवर नियंत्रण मिळावे, यासाठी स्थानिक विहिरीतून पाणीपुरवठा घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. दोन्ही ट्रकमधील चालकांना वाचविण्यात यश आले असले, तरी आगीत ट्रक आणि आतील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा