ओडिशा, ३१ मार्च २०२३: ओडिशामधील संबलपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. लग्न आटोपून घरी परतताना चारचाकी वाहन कालव्यात कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात ७ जण जागीच ठार झाले आहेत तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत झारसुगुडा जिल्ह्यातील बडाधरा गावातील रहिवासी आहेत. ते संबलपूर शहराजवळील एका गावातून झारसुगुडा येथील त्यांच्या गावी परतत होते. त्याचे वाहन कालव्यात कोसळून बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
संबलपूर जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात सातजण मृत्यूमुखी झाले आहेत. त्यांची नावे अजित खमारी (वय २५), सुबल भोई (वय २४), रमाकांत भोई, दिब्या लोह, सरोज सेठ, सुमंत भोई, आणि शमाकांत भोई, अशी मृतांची नावे आहेत. कालव्यातून सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, गाडीचा चालक फरार आहे. दुसरीकडे दोन जण गंभीर जखमींना संबलपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
बचावपथक वेळीच घटनास्थळी पोहोचले असते तर सर्व प्रवाशांना वाचवता आले असते. पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. आम्ही वाहनाच्या काचा फोडल्या आणि स्वतः ला वाचवलं नंतर त्यांना वाचवले तेव्हा त्यांचा श्वास सुरू होता, पण कोणतेही रुग्णवाहिका किंव्हा ऑक्सिजन सपोर्ट घटनास्थळी पोहोचला नाही. त्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला. असे अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीने सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर










































